श्री देवी आर्यादुर्गा आणि गूढरम्य देवीहसोळ ….

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी पासून सुमारे ५० किलोमीटर व राजापुर पासुन २२ किलोमीटरवर देवीहसोळ हे गाव प्रसिध्द आहे ते म्हणजे इथल्या ग्रामदेवता श्री.आर्यादुर्गा देवी व श्री. जाकादेवी या जागृत देवस्थानासाठी होय.निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या आणि अतिशय शांत अशा परिसरात वसलेल्या देवीहसोळ गावची ग्रामदेवता श्री.आर्यादुर्गा देवी मातेची आख्यायिका आणि इतिहास दोन्हीही केवळ रोमांचक आहे.देवीहसोळ गावचे मूळ नाव हसोळ.देवीच्या वास्तव्यावरून ते देवीहसोळ असे पडले. मुचकुंद ऋषी तपाचरणाने पावन झालेला रमणीय परिसर व मुचकुंदी नदी किनारी हे गाव वसलेले आहे.

दंतकथा/आख्यायिका :-
अंकोला (कर्नाटक) येथील श्री.आर्यादुर्गा देवी मातेच्या जागृत देवस्थानाला देवीहसोळ गावातील एक रहिवाशी नियमाने देवीच्या दर्शनाला जात असे. पुढे काही वर्षाने वृद्ध झाल्यामुळे यापुढे प्रतिवर्षी देवीच्या दर्शनाला जाणे जमणार नाही म्हणून दर्शनाची शेवटची वारी आहे असे मनाशी ठरवले व याप्रमाणे देवीच्या दर्शनाला जाऊन देवीची प्रार्थना केली.व मनातील विचार देवीजवळ प्रकट करून त्यांनी देवीचा निरोप घेतला. त्याच पहाटे त्यांना देवीचा दृष्टांत झाला .”तु घरी जा, येथे परत येण्याची गरज नाही. मी तुझ्या मागे येते. मात्र तु मागे वळून पाहू नकोस “. त्याप्रमाणे ते निघाले. मागे सतत पैंजणाचा आवाज येत होता. कोणीतरी आपल्या मागे येत असल्याचे त्यांना जाणवत होते. गावाच्या सिमेच्या आत आल्यावर आनंदाने त्यांचा मनावरील ताबा सुटला व त्यांनी मागे पाहिले आणि त्यांना देवीचे दर्शन झाले. त्यांनी देवीला साष्ट्रांग नमस्कार घातला ; पण देवी अदृश्य झाली. मात्र कातळावर (दगडावर ) देवीचे पावले उमटलेली त्यांना दिसली. नंतर देवीने स्वप्नात येऊन सांगितलं की , ” मी इथेच राहणार आहे. या पावलांची तू पूजा करींत जा ” त्याच प्रमाणे त्यांनी त्या पावलावर घुमटी बांधून तेथे पूजेला सुरवात केली. अशा रितीने श्री आर्यादुर्गा देवी देवीहसोळ गावामध्ये आली आणि देवीहसोळ गावात श्री आर्यादुर्गा मातेचं स्वयंभू स्थान स्थापन झाले.१९७१ साली कै. श्री गजानन सीताराम वाघाळे व त्यांचे बंधू कै. श्री सदानंद सीताराम वाघाळे या बंधूनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला.

देवीची पावले

पुराण कथा :-
प्राचीन काळी वृत्रासुर नावाचा दैत्यराजा होऊन गेला. त्याने सर्व भूलोक जिंकून स्वर्गावर स्वारी केली. इंद्र, अग्नि, वरुण, यम वगैरेंना जिंकले व त्या ठिकाणी आपल्या असुरांची दिग्पाल म्हणून नेमणूक केली. स्वर्गातील सर्वांना छळण्यास सुरुवात केली सर्व देवांनी एकत्र येऊन श्री ब्रह्मदेवाची, श्री विष्णुंची प्रार्थना करुन वृत्रासुराने अत्याचाराने केलेल्या दुरावस्थेची हकीगत त्यांच्या कानावर घातली.हे ऐकताच श्री विष्णू कोपले. त्या रागाचे आवेशात त्यांच्या तोंडातून अतिदिव्य तेज बाहेर आले हे पाहताच ब्रह्मदेव, इंद्र वगैरे देवांचे तोंडातून भयंकर तेज बाहेर पडली. ही सर्व एकवटून त्यापासून एक मोठा तेजगोळा निर्माण झाला आणि त्यातून एक महादिव्य रुप धारण केलेली महादेवी प्रकट झाली.देवीने महाभयंकर गर्जना केली तिला पाहून सर्व देवांना,ऋषींना अतीव आनंद झाला. त्यांनी आपापली अस्त्रे, चक्र, पाश, वज्र, शस्त्रे, अस्त्रे, आयुधे, वाहने तिला अर्पण केली. या महादेवीची सर्व देवांनी स्तुती केली. ‘‘हे देवी, तू विश्वजननी आहेस. तूच सर्व शक्तींची अनेक रुपे, बुध्दि-सिध्दी, सर्व रुपिणी आहेस तू दुर्जय व दुर्गम्य आहेस म्हणूनच तू ‘दूर्गा’ या नावाने प्रख्यात होशील’’ अश्या रीतीने हा देवीचा अवतार होऊन ती दूर्गा झाली.तिची गर्जना ऐकून वृत्रासुर तिला पाहण्यास आला तिला पाहून तो घाबरला, तरी पण तो तिच्यासोबत युध्द करु लागला. दोघांचे महाभयंकर युध्द झाले,शेवटी वृत्रासूर मारला गेला. सर्व देवदानवांची त्याच्या त्रासातून सुटका झाली. सर्वांनी देवीचा उदो उदो केला. नंतर ब्रह्मदेवांनी तिला विनविले की,‘हे देवी, तुला अजून अनेक कार्ये करावयाची आहेत. तरी तू हिमगिरी पर्वताच्या शतशृंग शिखरावर जाऊन वास्तव्य कर’ ते देवीने मान्य करुन तिथे वास्तव्य कर’ ते देवीने मान्य करुन तिथे वास्तव्य केले. पुढे वृषवर्ण नावाच्या असुर राजाचा पुत्र महिषासुर हा महाबळी, पराक्रमी होता. त्याची राजधानी शोणितनगर होती. त्याने उग्र तप करुन ‘आपल्याला देव वा दानव कोणीही मारणार नाही’ असा वर मिळवला (पण त्यावेळी तो स्त्रीला विसरला) वर मिळाल्यावर उन्मत्त होऊन त्याने सर्व जगाला, देवांना त्रास देण्यास सुरुवात केली.शेवटी देवीने त्याच्याशी महाभयंकर युध्द करुन त्यालाही नाहीसे केले. देवांनी तिच्यावर पुष्पवृष्टी करुन आनंद व्यक्त केला. त्यानंतर पुन्हा सर्वत्र शांती नांदू लागली.पुढे सन १५०५ चे सुमारास पोर्तुगीजांनी लालसेने हा प्रांत जिंकून घेतला व ख्रिस्ती धर्माचे प्रचारासाठी हिंदू देवळे तोडणे, मूर्ती भंग करणे इत्यादी प्रकार सुरु झाले. म्हणून बिगणे गावाचे कामत वगैरे सारस्वतांनी पुढाकार घेऊन बिणगे येथे देवीची स्थापना केली. पुढे टिपू सुलतानाचे राज्य आले. त्यावेळी भीतीने लोकांनी ही देवी ‘अरंभीला’ तालुक्यातील बंदिगे गावी हलविली व तिची स्थापना करुन आज असलेले देऊळ बांधले. त्यानंतर हे स्थान ‘श्री आर्यादुर्गा अंकोला’ म्हणून प्रसिध्द झाले.

नवरात्र उत्सव :-
आश्विन महिन्यात शुक्ल प्रतिपदेपासुन ते दशमी पर्यंत दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. पहिल्या दिवशी सर्व देवतांची रुपे स्वच्छ करुन रुपे लावून सर्व देवता सजवले जातात. संपूर्ण नवरात्र उत्सवा दरम्यान गावाच्या आजूबाजूच्या भागातील व महाराष्ट्रातून देवींच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भाविक मंदिरात येतात.

देवी आर्यादुर्गा यात्रा :-
मार्गशिर्ष वद्य अष्टमी आणि नवमी या दोन दिवस देवीची मोठी म्हणजेच राजापूर तालुक्यातील प्रशिध्द अशी यात्रा भरते. या यात्रेचे महत्व गावात इतके असते की घरातील सण किंवा लग्न कार्य यापेक्षाही मोठे असते. कारण गावातील चाकरमान्यासह पाहुणे मंडळी आणि गावाच्या बाजूच्या व गावातील भाविकही या यात्रेस मोठ्या संख्येने येतात.

श्री जाकादेवी माता :-
देवीहसोळ गावातील श्री जाकादेवी मातेचं मंदिर गावातील ग्रामस्थांचे व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवीहसोळ गावातील ग्रामस्थ परंपरेनुसार श्री जाकादेवी मातेला आपल्या मुलांचा पाळणा श्री आर्यादुर्गा देवी, श्री जाकादेवी माता जत्रा उत्सवादरम्यान अर्पण करतात.

देवीहसोळ मधील कातळशिल्पे :-
देवी आर्यादुर्गा मंदिराच्या मंदिराच्या अलिकडे व मंदिराला लागून रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे पंधरा चौरस फुटांची चौकट आखलेली दिसते. त्या चौकटीला चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेले आहे. चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले दिसतात. त्या चार भागांमध्ये विविध आकृती कोरलेल्या आहेत. त्यांतील काही समजतात, काही अनाकलनीय आहेत.तेथे सर्वत्र विविध कातळशिल्पे खोदलेली दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी प्रामुख्याने आढळतात. काही कातळशिल्पे कोरताना अर्धवट सोडलेली आहेत; मात्र बरीचशी सुस्पष्ट अशी खोदलेली आहेत.
चौकटीच्या मध्यभागी गोल खोलगट खड्डा आहे. त्यात पाणी साठलेले असते. त्यामध्ये माया कॅलेंडर साम्य दाखवणारे सर्पयंत्र,गूढ ग्रहमाला,प्राणी,पक्षी अजस्त्र विहीर,व पुरातन चित्रलिपीतील शिलालेख अस्तित्वात आहेत. मध्य व दक्षिण अमेरिकेत सात हजार वर्षापूर्वी माया, टॉलटेक या संस्कृती नांदत होता.या संस्कृतीत माया लोक अधिक प्रगत व खगोल गणितात पारंगत होती. या माया संस्कृतीशी साधर्म्य दाखवणारी शिल्पे इथे आढळतात असे इतिहास संशोधक म्हणणे आहे..

प्राचीन चालीरीती/परंपरा :-
देवीहसोळच्या जवळ भालावली नावाचे गाव आहे. त्या गावात नवदुर्गेचे मंदिर आहे. देवीहसोळच्या आर्यादुर्गेचा उत्सव मार्गशीर्ष वद्य अष्टमीला असतो. त्यावेळी भालावलीहून नवदुर्गेची पालखी त्या देवीच्या भेटीला येते. त्या दोन गावच्या दोन देवींची भेट त्यावेळी कातळशिल्पावर होते, हे एक नवल म्हणायला हवे! त्या भेटीच्या वेळी कातळशिल्पाच्या मधोमध असलेल्या खोलगट भागात फुरसे नावाचा विषारी साप येतो आणि तो तेथेच दिवसभर बसून असतो असे स्थानिक सांगतात. त्या कातळशिल्पापासून देवीच्या मंदिरापर्यंत शंभर मीटर अंतर आहे.

प्राचीन बारव (विहीर) :-
त्या कातळशिल्पांपासून जेमतेम दोनशे मीटर अंतरावर कातळात खोदलेली मोठी विहीर बघण्यासारखी आहे. अंदाजे चाळीस फूट खोल विहिरीला उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या आहेत. कातळशिल्पाशेजारी विहीर हे सूत्र तेथे तरी पाहण्यास मिळते.

कसे जायचे :-
रेल्वेने राजापूर स्थानक गाठावे तेथून खाजगी वाहने व रिक्षा मिळतात.महाराष्ट्र शासनाच्या ST बसने राजापूर बस स्थानक गाठावे.ईथुनही खाजगी वाहने,ST आणि रिक्षा मिळतात.श्री आर्यादुर्गा मंदिर हे रत्नागिरीपासून 50 किमी आणि राजापुरपासून 22 किमी अंतरावर आहे.

जवळील प्रेक्षणीय स्थळे –
कणकादित्य मंदीर, महाकाली मंदीर, गोडवणे बीच, कातळशिल्पे, मुसाकाजी बंदर, यशवंत गड

साभार सूची :- श्री आर्यादुर्गा विश्वस्त संस्था देवीहसोळ,रत्नागिरी पर्यटन,
थिंक महाराष्ट्र,कातळशिल्प अभ्यासक अमोल पाध्ये सर,आशुतोष बापट सर,भाई रिसबुड..

संकलन
किरण भालेकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *