राजापूरचे श्रद्धास्थान -श्री देव धुतपापेश्वर

रामायण,महाभारत या काळापासून ओळखला जाणारा अपरांत भूप्रदेश म्हणजे आजचे कोकण होय.भगवान परशुरामांनी समुद्र आटवून या कोकणची निर्मिती केली आहे.परंतु हा प्रदेश देवांची भूमी देवभूमी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे.देव या संकल्पनेशी असलेले नाते हे भक्तीच्या संबंधातील असते परंतु कोकणात मात्र गावातील ग्रामदैवतांचे स्थानिक लोकजीवनाशी असलेले नाते भक्तीत सुरू होऊन भक्तीमध्येच संपत नाही तर हे नाते आबालवृद्धांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग्य आणि लोकरीती व लोकनीतीचे केंद्रस्थान असते.निसर्गरम्य प्राचीन कोकण आणि प्राचीन संस्कृतीशी नातं सांगणारी विविध काळात बांधली गेलेली सुरेख मंदिरे प्रत्येक मंदिरांची स्थापत्यशैली वेगळी, निसर्गाची नवलाई वेगळी,आणि त्याच्या आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत.
असेच एक अनवट व प्राचीनता लाभलेले कोकणातील एक प्रसिद्ध देवस्थानाबद्दल माहिती करून घेऊया…

श्री देव धुतपापेश्वर :
रत्नागिरी जिल्हातील राजापूर तालुका आणि या तालुक्यामधील धोपेश्वर गाव या गावात हजार ते बाराशे वर्षाचा इतिहास अभिमानाने मिरवीत धुतपापेश्वर हे मंदिर प्राचीनतेची साक्ष देत उभे आहे.डोंगराच्या कुशीत दडलेले, निसर्गसौंदर्य ओतप्रेत भरलेले,अजरामर शिल्पकलेची कलाकुसर असलेले हे मंदिर देव श्री धुतपापेश्वर आणि इथला रमणीय परिसर पर्यटकांना भुरळ पाडत आहे.बघाताक्षणीच मन प्रसन्न व्हावे असे स्वर्गीय अनुभूती देणारे शांत व रमणीय ठिकाण आहे.
हे शिवमंदिर प्राचीन आहे.सुरूवातीला नगारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडी द्वारपाल, त्यानंतर दिंडी दरवाजा, आत गेल्यावर देवडी, देवडीच्या भिंतीवर पेशवेकालीन चित्रकला प्रकारातील धार्मिक आशयाची चित्रे आहेत व खांब आहेत.मंदिराचा जिर्णोद्धार झाला त्यावेळी मंदिराचं शिखर हे राजस्थान मधून ढोलपूर दगड आणून नागर शैलीत करण्यात आले. प्रशस्त सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी पारंपारिक रचना आहे. सभामंडप हे लाकडी नक्षीदार खांबावर तोललेले असून पारंपारिक चौपाखी कौलारू छप्पर आहे. देवाचा गाभारा मात्र काळ्या दगडात असून त्याची रचना व कला उच्च दर्जाची आहे. गाभार्‍यातील स्वयंभू शिवलिंगाचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामागे धार्मिक संदर्भ आहे. समस्त राजापूरकरांचं आराध्य दैवत,ग्रामदैवत असलेले श्री धूतपापेश्वर हे जागृत देवस्थान आहे.देशविदेशातील भाविक व अभ्यासक या ठिकाणी भेट देत असतात.

● कोटीतीर्थ धबधबा :-
मंदिर बाजूला एक छोटेखानी परंतु तितकाच सुंदर धबधबा आहे.मृडानी नदीच्या काठावर असलेले हे मंदिर नदीच्या दोन्ही बाजूंच्या मोठ्या डोंगरांमध्ये आहे. मृडानी नदी डोंगरावरून खाली येताना मंदिराजवळच एक धबधबा तयार झाला आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात या धबधब्याला भरपूर पाणी असते. पावसाळ्यात येथे भाविक आणि पर्यटक यांची गर्दी असते.

इतिहास :-
राजापूरच्या परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता. काशीविश्वेवर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे शिवभक्त दरवर्षी काशीला जात असत. परंतु वृद्धापकाळामुळे पुढे इतक्या दूर जाववेना.त्यांजकडे एक गाय होती. तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पान्हा सोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे रागातच त्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्या खडकाचा एक खडपा उडून विशालगडजवळच्या कासर्डे गावी जाऊन पडला, आणि त्याचे ‘कपालेश्वर’ लिंग झाले. मूळ खडक त्याच स्थानी राहिला. निळो भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले. त्यांना खूप वाईट वाटले कारण शिवलिग भंग झाले त्याला आपणच कारणीभूत आहोत असे त्यांना वाटले.आजही ते स्वयंभू शिवलिगं तुटलेलेच आहे.खडक फोडल्यावर ती गाय पळू लागली. तिने मंदिराच्या शेजारील डोहात उडी घेतली (कोटीतीर्थात). निसीम्म शिव भक्त असलेले निळोबा भटांना खुप वाईट वाटले शिवलिगं भंग आणि पवित्र गाईचा मृत्यू यास आपणच जबाबदार आहोत असे म्हणून पापाचे प्रायश्चित म्हणून निळोबाही धावले आणि त्यांनीही कोटीतीर्थात देहविसर्जन केले.
अशी ही भावपूर्ण आख्यायिका आहे.

थोरल्या माधवराव पेशव्यांनी या मंदिराला भेट दिली होती त्यांनी मंदिरासाठी शाळिग्राम भेट दिला होता.तो आजही धोपेश्वर गावातील ग्रामस्थं धोंडूमामा करंबळकर यांच्या घरात पहायला मिळतो.
तसेच पेशवेकाळातील सरदार बिनीवाले यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर सोन्याचा मुकूट भेट दिला होता.जो आजही पुजेत वापरतात.

प्रमुख वैशिष्ट्ये :-
● मंदिराशेजारून वाहणारी मृडानी नदी आणि या नदीवरील आकर्षक छोटे छोटे धबधबे. पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. संपूर्ण मंदिर परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे. गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे.

●मंदिराच्या सभामंडप आणि गर्भगृहावरील छतावर, खाबांवर,तुळयांवर ज्या प्राण्यांची,वनस्पतींची, फुलांची चित्रे काढून शिल्पकला केली आहे ते प्राणी वगैरे त्या मंदिर परिसरात आढळनारेच आहेत. उदाहरणार्थ – शंकराला वाह्याला जाणाऱ्यारा कैलासचाफा या आकर्षक फुलाचे झाड हे या एकमेव ठिकाणी पहायला मिळते.

● मंदिर परिसरातील खांबांवर आणि भिंतीवर चित्रांसाठी व शिल्पकलेवर वापरलेले रंग पूर्णत नैसर्गिक म्हणजे पाने, फुले झाडाची साल यांपासून तयार केलेले रंग आहेत.दररोजच्या पूजेत मांडलेल्या समयांवर इ.स.तारीख आहे त्यामुळे हे मंदिर किती प्राचीन असणार आहे याची कल्पना येते.

●दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि शंकर-पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा (सोंगट्यांचा) खेळ मांडला जातो, . आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात तेव्हा ह्या सोंगट्या विखुरलेल्याले आढळतात. असे दररोज होत नाही आणि होईलच असे नाही शक्यतो (सोमवार, गुरुवार, अमावास्या, महाशिवरात्र, श्रावण सोमवार) यावेळी जास्त होते. येथील भाविकांची श्रद्धा आहे की भगवान शंकर-पार्वती येते येऊन सारीपाट खेळून जातात.

●राजापूरची गंगा ज्यावेळी प्रकट होते त्यावेळी लोक प्रथम उन्हाळे येथे जाऊन गरम पाण्याच्या प्रवाहात आंघोळ करतात, नंतर राजापूरच्या गंगेत स्नान करतात. आणि राजापूरच्या अर्जुना नदीपात्रातील पुंडलिकाचे दर्शन घेऊन धूतपापेश्वरला अभिषेक करतात. असे केल्यावर कशीविश्वेश्वराचे दर्शन पूर्ण होते अशी भावना राजापूर आणि आसपासच्या गावातील भाविकांची श्रद्धा आहे.

●धूतपापेश्वर मंदिराच्या बरोबर मागे कामेश्वराचे मंदिर आहे राजापूर व आसपासच्या गावातील एखादे जनावर आजारी पडले किंवा दूध देत नसेल तर या मंदिरात नवस केला जातो. त्यांचे जनावर ठणठणीत बरे होते. असा अनुभव ग्रामस्थांना आहे.

●भेट देण्याचा कालावधी :-

सर्वोत्तम कालावधी हा अर्थात वर्षाऋतू आहे.धबधब्यांनी व हिरव्यागार वनश्रीने नटून गेलेला परिसर पाहायचा असेल तर वर्षाऋतु योग्य राहील किंवा अन्य कोणत्याही ऋतूमध्ये मंदिराला भेट देणे योग्य राहील.महाशिवरात्री दिवशी या ठिकाणी मोठी जत्रा असते भाविकांसाठी हि एक विशेष पर्वणी असते.किंवा श्रावण सोमवारी सुद्धा ईथे मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात.विजयादशमी (दसरा) या दिवशी सुद्धा इथे उत्सव असतो.

●जायचे मार्ग :-
1) राजापूर बस स्टेशन पासून हे मंदिर 3 ते 4 किमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ST ने राजापूर बस स्टेशन येथे यावे व ईथुन आपल्याला खाजगी वाहने व रिक्षा मिळतात.

2) राजापूर रोड रेल्वे स्थानक :- राजापूर रोड स्थानकातून आपल्याला रिक्षा किंवा थेट ST बस,खाजगी वाहने मिळतात त्या थेट मंदिराजवळ सोडतात.

3 मुंबई ते राजापूर हे 685 किमी आहे.पुण्यावरून सातारा यावे व साताराहुन राजापूर बस पकडावी..

●राहण्याची व्यवस्था :-
राजापूर शहरात हॉटेल/लॉज येथे व्यवस्था होते.

साभार/संदर्भसूची
विकिपीडिया,मराठी ब्लॉग,वर्तमानपत्रे,राजापूर पर्यटन

संकलन/लेखन
किरण भालेकर

फोटोग्राफी साभार – नील तांबे,गुुगल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *